तिलक वर्मा जे काही म्हणाला, ते त्याने केले… दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील विजयानंतर सूर्यकुमार यादवने उघड केले रहस्य


सेंच्युरियनमध्ये तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. मधल्या फळीत खेळणारा खेळाडू टॉप ऑर्डरचा खेळाडू कसा होऊ शकतो? असा प्रश्न मनात नक्कीच निर्माण झाला असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने यामागे एक रंजक गोष्ट सांगितली. सूर्याच्या म्हणण्यानुसार, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय तिलकाचाच होता, त्याने स्वतः पुढे येऊन मला ही संधी मागितली होती आणि, मला आनंद आहे की त्याने संधीचे चांगले सोने केले. त्याने जे सांगितले, ते केले आहे.

सूर्यकुमार यादवने सांगितले की, दुसऱ्या टी-20 नंतर तिलक वर्मा हॉटेलमधील माझ्या खोलीत आला आणि मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मागितली. त्याने मला अधिक चांगल्या कामगिरीचे आश्वासन दिले. तिलकचे म्हणणे ऐकून मी होकार दिला. त्याला त्याचा हेतू अंमलात आणण्याची संधी दिली. आता मला बरे वाटते की त्याने मला जे करणार असे सांगितले, ते त्याने केले. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.

कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या दालनात तिलक वर्मा काय म्हणाला होता ते आम्हाला कळले. आता आपण हे देखील जाणून घेऊया की त्याने आपल्या शब्दांचे कृतीत रूपांतर कसे केले? भारतीय डावाच्या तिसऱ्या चेंडूपासूनच त्याने या कामाला सुरुवात केली. सलामीवीर संजू सॅमसन सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर, तिलक वर्मा फलंदाजीसाठी क्रीझवर आला आणि वेळ न घालवता त्याने आपल्या कर्णधाराला सांगितल्याप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने 56 चेंडूत नाबाद 107 धावा केल्या. 191.07 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या डावात 7 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. तिलक वर्माने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि टीम इंडियाने एकूण 219 धावा करून दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च T20 धावांचा विक्रम मोडला. याआधी त्याने 2007 मध्ये 218 धावा केल्या होत्या.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा T20 सामना 11 धावांनी जिंकला, ज्याचा हिरो होता डावखुरा फलंदाज तिलक वर्मा. या विजयासह भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असली तरी तिलकला आणखी तीन यश मिळाले. त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास जिंकला, सामनावीर बनला आणि कदाचित भविष्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले.