
सणासुदीनंतर भारतात लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. लग्न हा देशातील सर्वात महागडा सोहळा मानला जातो. पालक लाखो रुपये खर्च करून मुलांची लग्ने थाटामाटात लावतात. अनेकवेळा लोक आयुष्यभराची कमाई यातच घालवतात आणि काहीजण यामुळे कर्जबाजारीही होतात. त्याच वेळी, काही अहवालांनुसार, भारतातील लोक शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च करतात. अशा परिस्थितीत लग्नसराईचा हंगाम सुरू होत असताना, अंदाजानुसार केवळ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच 35 लाख विवाह होणार आहेत. या विवाहसोहळ्यांवर एकूण 4.25 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
भारतात 2 महिन्यांत होणार 35 लाख विवाह, 4.25 लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज
एका अहवालात असे दिसून आले आहे की एक भारतीय त्याच्या लग्नावर त्याच्या शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च करतो. काही लोकांच्या दृष्टीने हा फालतू खर्च असू शकतो, पण मनोरंजक गोष्ट म्हणजे हा फालतू खर्च भारतीय अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देण्याचे काम करतो. अशा परिस्थितीत लोक हे 4.25 लाख कोटी रुपये कुठे खर्च करणार आहेत हे जाणून घेऊया…
यावर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात 35 लाखांहून अधिक विवाह होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुमारे 4.25 लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. भारतात दरवर्षी सुमारे एक कोटी विवाह होतात. अहवालानुसार, हे क्षेत्र भारतातील चौथ्या क्रमांकाचा उद्योग आहे. यावर्षी विवाहसोहळ्यांवर 130 अब्ज डॉलर्स खर्च होतील आणि रोजगाराच्या कोट्यावधी संधी निर्माण होतील असा अंदाज आहे.
एका अहवालानुसार, सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्के केले आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. भारतात धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या सोन्याला खूप महत्त्व आहे. लोक याकडे गुंतवणूक म्हणूनही पाहतात.
सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारातही मजबूती दिसून येत आहे. जेव्हा लोक लग्न आणि सणांवर खर्च करतात तेव्हा रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ज्वेलरी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना फायदा होतो. ही सर्व क्षेत्रे आर्थिक विकासाला हातभार लावतात.
मागणी वाढल्याने कंपन्यांचा नफाही वाढेल. यामुळे कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढतील. याचा संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल. भारतातील लग्नाचा हा हंगाम केवळ आनंदाचाच नाही तर अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा आहे. लग्नादरम्यान होणारा खर्च आणि वाढती मागणी सर्वच क्षेत्रांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत.
