इशान किशन आता फक्त आयपीएल खेळणार, नाही होणार टीम इंडियात वापसी!


इशान किशन पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला असून याला कारण आहे, त्याची झंझावाती खेळी. या डावखुऱ्या फलंदाजाने अलीकडेच बुची बाबू स्पर्धेत झारखंडला विजय मिळवून दिला. इशानने मध्य प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावून संघाला चॅम्पियन बनवले. इशानच्या या खेळीनंतर तो लवकरच टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे, मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीचे मत आहे की, या खेळाडूसाठी टीम इंडियात परतणे कठीण आहे.

बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर दावा केला आहे की, ईशानसाठी टीम इंडियामध्ये परतणे जवळपास अशक्य आहे. बासित म्हणाला, ‘इशान किशनने आता फक्त आयपीएलवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण तो ऑस्ट्रेलिया मालिकेपर्यंत टीम इंडियामध्ये परत येऊ शकत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत टीम इंडियात पुनरागमन करणे त्याच्यासाठी कठीण आहे. यानंतर काय होते ते पाहूया.

इशान किशन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने दक्षिण आफ्रिका दौरा मध्येच सोडला, त्यानंतर तो टीम इंडियात परतला नाही. ईशानला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सांगितले होते आणि आता तो बुची बाबू स्पर्धेत खेळत आहे. रणजी ट्रॉफीमध्येही तो झारखंडचे नेतृत्व करताना दिसणार असल्याचे मानले जात आहे. ईशानने शेवटचा रणजी सामना 2022 मध्ये खेळला होता. 2023 मध्ये त्यांनी त्यात भाग घेतला नाही.

तसे, बासित अलीचा दावा केवळ हवाच असल्याचे दिसते. टीम इंडियाला इशान किशनच्या टॅलेंटची जाणीव आहे आणि जर त्याच्या बॅटने धावा करत राहिल्यास हा खेळाडू टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो. टीम इंडियाला आता बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. सीनियर खेळाडूंना विश्रांती मिळाली, तर इशान किशनलाही या मालिकेत पाहता येणार आहे. पण पुनरागमन करण्यासाठी त्याला झटपट धावा करत राहावे लागेल.