
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका आजपासून म्हणजेच 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर पहिल्यांदाच ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर मालिकेतील पहिल्या सामन्यासह भारतीय चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षाही संपुष्टात येणार आहे.
आता संपणार 2,524 दिवसांची प्रतीक्षा, श्रीलंकेतील हा क्षण पाहण्यासाठी आतुर झाले भारतीय चाहते!
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरताच, गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेली प्रतीक्षाही संपुष्टात येईल. वास्तविक, 3 सप्टेंबर 2017 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा हे दोन स्टार खेळाडू श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळतील. हे दोन्ही खेळाडू 2017 च्या द्विपक्षीय मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेला गेले नव्हते.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शेवटच्या श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय मालिकेसाठी चांगली कामगिरी केली होती. विराटने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 110.00 च्या सरासरीने 330 धावा केल्या होत्या. या काळात विराटने 1 अर्धशतक आणि 2 शतके झळकावली होती. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता. याशिवाय रोहित शर्माने 5 सामन्यात 75.50 च्या सरासरीने 302 धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याने 1 अर्धशतक आणि 2 शतके झळकावली. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
दरम्यान केएल राहुल आणि श्रेयस अय्यरवरही सर्वांची नजर असणार आहे. राहुल आणि अय्यर बऱ्याच काळानंतर भारतीय संघाकडून खेळणार आहेत. श्रेयस अय्यरने फेब्रुवारी 2024 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला, जो एक कसोटी सामना होता. तर, केएल राहुलने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी 2024 मध्ये खेळला होता.
श्रीलंका दौऱ्यावर असलेला भारतीय वनडे संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
