रोहित शर्माचा आयपीएलमधील फॉर्म बघू नका, त्याचे इरादे बघा, टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसेल नवीन चमक


रविवारी हैदराबादला हरवून मुंबईने आपल्या चाहत्यांना हसण्याची आणि जल्लोष करण्याची संधी दिली. पण या दरम्यान मुंबईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या खात्यात 12 सामन्यांत फक्त 4 विजय म्हणजे 8 गुण आहेत. आता मुंबईने उर्वरित दोन सामने जिंकले, तरी जास्तीत जास्त 12 गुणांचा टप्पा गाठता येईल. जे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुरेसे नाही. रोहित शर्माने या मोसमात आतापर्यंत 12 सामन्यांत 330 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 30 आहे आणि स्ट्राइक रेट 152.78 आहे. यात रोहित शर्माच्या शतकाचाही समावेश आहे. जे त्याने चेन्नईविरुद्ध केली होते. मात्र, त्याच्या शतकानंतरही चेन्नई संघाने विजय मिळवला होता.

येथपर्यंत सर्वकाही ठिक होते, पण सोशल मीडियावर रोहित शर्माबाबत एक आकडा फिरू लागला. ज्यात गेल्या पाच सामन्यांमध्ये रोहित शर्माने केलेल्या धावांचा उल्लेख होता. गेल्या 5 सामन्यांमध्ये रोहित शर्माने केवळ एकदाच दुहेरी आकडा पार केला आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही त्याने केवळ 11 धावा केल्या होत्या. अन्यथा त्याच्या राजस्थानविरुद्धच्या 6 धावांच्या, दिल्लीविरुद्धच्या 8, लखनऊविरुद्धच्या 4 आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या 4 धावांच्या खेळीबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रश्नांची उत्तरे अगदी सोपी आहेत – रोहित शर्माच्या कारकिर्दीच्या वळणावर आणि टप्प्यावर, तुम्ही त्याचा फॉर्म नव्हे, तर त्याच्या हेतूकडे पहावे. आम्ही याबद्दल अधिक तपशीलवार वर्णन करू, परंतु त्याआधी हे जाणून घ्या की रोहित शर्माकडून केवळ या हंगामातच नव्हे, तर गेल्या तीन-चार हंगामात धावा केल्या गेल्या नाहीत. 2020 मध्ये मुंबई शेवटच्या वेळी चॅम्पियन बनली होती. त्यावेळी रोहितने 12 सामन्यात 332 धावा केल्या होत्या. यानंतर, 2021 मध्ये त्याने 29.30 च्या सरासरीने 381 धावा केल्या, 2022 मध्ये त्याने 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या आणि 2023 मध्ये त्याने 20.75 च्या सरासरीने 332 धावा केल्या होत्या.

क्षणभर 2023 चा विश्वचषक आठवा. रोहित शर्माच्या फॉर्मवर नव्हे, तर त्याच्या हेतूवर चर्चा का व्हायची याचे उत्तर तुम्हाला मिळेल. 2023 च्या विश्वचषकात रोहित शर्माने 11 सामन्यात 597 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतके होती. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट 125.94 होता. भारतीय संघातील हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट होता. हार्दिक पांड्याचा स्ट्राईक रेट यापेक्षा जास्त होता, पण तो फक्त चार सामने खेळला. याशिवाय 2023 विश्वचषकात 10 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्माचा सर्वाधिक स्ट्राइक रेट होता. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.

वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध 87 आणि पाकिस्तानविरुद्ध 86 धावांवर बाद झाला होता. 80 धावा ओलांडल्यानंतर, फलंदाज अनेकदा त्याचा वेग थोडा कमी करतो आणि शतकाकडे जातो. तेही विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत, इंग्लंड किंवा पाकिस्तानसारख्या मोठ्या सामन्यात कोणाला शतक झळकावायचे नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे- रोहित शर्मा. 86-87 च्या स्कोअरचे 100 मध्ये रूपांतर करण्याऐवजी रोहितने स्कोअरबोर्डवर संघाच्या धावा पाहिल्या. याशिवाय त्याचे चार डाव असे होते. ज्यामध्ये त्याने 40 किंवा 40 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याच्यासाठी 4 अर्धशतके निश्चित वाटत होती. या सर्व आकडेवारीवरून आता रोहित शर्माचे उद्दिष्ट फक्त ‘इम्पॅक्ट’ इनिंग खेळण्याचे आहे. याचा अर्थ वैयक्तिक टप्पे काहीही असले तरी संघाचा धावफलक हलता राहिला पाहिजे. म्हणजे काळजी करण्याची गरज नाही, रोहितच्या जर्सीचा रंग निळाच राहील. पण कदाचित त्याला टीम इंडियाचा निळा जरा जास्तच आवडेल.

2007 मधील पहिल्या T20 विश्वचषकातील विजयाची आठवण करा. क्रिकेट चाहत्यांना तो विजय आठवत असेल, पण कदाचित ते त्यात रोहित शर्माची भूमिका विसरले असतील. कारण त्यावेळी संघात रोहित शर्मापेक्षा मोठे स्टार खेळाडू होते. त्या संघात कर्णधार महेंद्रसिंग धोनीशिवाय वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग असे स्टार्स होते. त्यामुळेच रोहित शर्माच्या कामगिरीवर कोणतीही चर्चा झाली नाही. खरे तर रोहित शर्माला त्यावेळी सर्व सामन्यांमध्ये खेळण्याची संधीही मिळाली नव्हती. तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, रोहित शर्माने 2007 टी-20 विश्वचषकात खेळलेल्या चार सामन्यांमध्ये 144.26 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. मोठी गोष्ट म्हणजे या चारपैकी एकाही सामन्यात रोहित शर्मा बाद झाला नव्हता. एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण उर्वरित तीन सामन्यांत तो नाबाद परतला. यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 40 चेंडूंमध्ये झळकावलेल्या अर्धशतकाचा समावेश आहे, ज्यासाठी त्याला सामनावीराचा किताबही मिळाला. 2007 च्या तुलनेत टी-20 फॉरमॅटमध्ये आता खूप बदल झाला आहे.