या खेळाडूची टीम इंडियात झाली तिसऱ्यांदा निवड, इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत संपणार का पदार्पणाची प्रतीक्षा?


तो खेळाडू टीम इंडियात निवडला जातो, पण त्याला खेळवले जात नाही. तो भारताच्या कसोटी संघाचा भाग बनतो, पण अद्याप पदार्पण करू शकला नाही. यापूर्वीही दोनदा त्याच्यासोबत असे घडले आहे आणि यावेळी संघात पुनरागमन करण्याची ही तिसरी वेळ आहे. प्रश्न असा आहे की, इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्याच्या पदार्पणाची प्रतीक्षा संपणार का? आम्ही बोलत आहोत डावखुरा क्रिकेटपटू सौरभ कुमारबद्दल, ज्याची रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुस-या कसोटीतून बाहेर झाल्यानंतर सरफराज खान आणि वॉशिंग्टन सुंदरसह संघात निवड झाली आहे.

30 वर्षीय सौरभ कुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये यूपीकडून खेळतो. तिसऱ्यांदा त्याची टीम इंडियात निवड होणे, हा त्याचा सध्याचा फॉर्म किती जबरदस्त आहे आणि त्याची कामगिरी किती सातत्यपूर्ण आहे, याचा पुरावा आहे. मात्र, डावखुरा अष्टपैलू सौरभ कुमारची सध्याची क्रिकेटची आकडेवारीही याकडे निर्देश करते.

सौरभ कुमारने आत्तापर्यंत 68 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 12 अर्धशतकांसह 2061 धावा करण्यासोबतच त्याने 290 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 22 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा त्याचा विक्रम 64 धावांत 8 बळींचा आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर सौरभ कुमारने पुन्हा एकदा टीम इंडियात प्रवेश केला आहे. त्याचा भारतीय संघाशी पहिला संबंध नेट बॉलर म्हणून होता. त्याने तिथे सोडलेल्या प्रभावामुळे त्याच्यासाठी टीम इंडियामध्ये प्रवेश करण्याचे दरवाजे उघडले. प्रथम त्याचा श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धच्या संघात समावेश करण्यात आला होता आणि यावेळी त्याची इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी निवड झाली आहे. पण पदार्पणाची संधी कधी मिळणार? हा प्रश्न एक कोडे बनला आहे.

68 प्रथम श्रेणी सामने खेळण्याव्यतिरिक्त, सौरभ कुमारने 35 लिस्ट ए आणि 33 टी-20 सामने देखील खेळले आहेत. 49 विकेट्सशिवाय त्याने लिस्ट ए मध्ये 314 धावा केल्या आहेत. सौरभच्या नावावर टी-20 मध्ये 24 विकेट आहेत.