
लोकांच्या सुरक्षेचा विचार करून लवकरच वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात येणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रकरणी मोठी घोषणा केली असून, सरकार वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करणार नसल्याचे नितीन गडकरींनी स्पष्ट केले आहे.
कारमधील 6 एअरबॅग्जबाबत बदलला सरकारचा प्लॅन, नितीन गडकरींनी केले नवे वक्तव्य
लक्षात ठेवा की, गेल्या वर्षी लोकांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने ऑक्टोबर 2023 पासून 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एवढेच नाही तर, गेल्या वर्षी एमओआरटीएच अर्थात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये वाहनांमधील लोकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत 1989 मध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले होते.
रस्ते अपघातांमुळे वाहनधारकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी, 1 एप्रिल 2021 पासून देशात विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या समोरील दोन एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ सर्व कारमध्ये स्टँडर्ड 2 एअरबॅग असणे अनिवार्य आहे.
नितीन गडकरी यांनी नुकत्याच आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. नितीन गडकरी म्हणाले की, लोक आता जागरूक झाले आहेत, त्यामुळेच आता 6 एअरबॅग्जचा नियम अनिवार्य केला जाणार नाही.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी सरकारने अंदाज लावला होता की आणखी चार एअरबॅग जोडण्यासाठी प्रति वाहन $75 (अंदाजे 6,221 रुपये) पेक्षा जास्त खर्च येणार नाही. पण दुसरीकडे, ऑटो मार्केट डेटा प्रदाता JATO Dynamics चे म्हणणे आहे की असे केल्याने खर्चात किमान $231 (अंदाजे 19,161 रुपये) वाढ होईल.
