
मराठवाड्यातला लातूर मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री (आताचे पंजाबचे राज्यपाल) शिवराज पाटील-चाकूरकर यांचा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघात आता काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लातूर मतदारसंघ हा परंपरेने कॉंग्रेसच्या वर्चस्वाखालचा मतदारसंघ आहे. १९७७ साली शेकापचे ज्येष्ठ नेते उद्धवराव पाटील यांनी या मतदारसंघात आणीबाणीनंतरच्या वातावरणात विजय मिळवला होता. तेवढा अपवाद वगळता २००४ पर्यंत या मतदारसंघात कॉंग्रेसचाच उमेदवार सतत निवडून आला आहे. शिवराज पाटील १९८०, ८५, ८९, ९१, ९६, ९८ आणि ९९ अशा सात निवडणुका सतत जिंकले होते. २००४ साली मात्र कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या स्नुषा रूपा पाटील यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून शिवराज पाटलांचा पराभव केला.
