
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी गेली काही वर्षे फॉर्मच्या दृष्टीने चांगली नव्हती. त्याने कर्णधारपद तर गमावलेच, पण त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्न निर्माण होऊ लागले. कोहलीला टी-20 विश्वचषकातून बाहेर काढण्याचीही चर्चा होती. कोहली सर्व बाजूंनी टीकेचा बळी ठरत होता. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कोहलीने आशिया चषकात शतक झळकवले आणि त्याची वाईट वेळ संपुष्टात आली. या सामन्यानंतर कोहलीने केवळ महेंद्रसिंग धोनीच त्याच्याशी खराब फॉर्ममध्ये बोलल्याचे विधान केले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले की, त्याच्या वाईट काळात त्याचे कुटुंब आणि बालपणीचे प्रशिक्षक त्याच्यासोबत होते. कुटुंबाव्यतिरिक्त, धोनीने या काळात त्याला साथ दिली. धोनीच्या एका संदेशाने कोहलीत नवा उत्साह भरला होता.

एक किस्सा सांगताना तो म्हणाला, धोनी फारसा कोणाच्याही संपर्कात राहत नाही. जर मी त्याला असा फोन केला, तर तो फोन उचलणार नाही याची 99 टक्के शक्यता आहे कारण तो फोनकडे बघतही नाही. अशा परिस्थितीत मला मेसेज करणे ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे. असे त्याने दोनदा केले. धोनीने आपल्या संदेशात लिहिले की, जेव्हा लोक तुम्हाला मजबूत समजतात आणि ते तुम्हाला मजबूत पाहतात, तेव्हा तुम्ही कसे आहात हे विचारायला विसरतात. त्याच्या या गोष्टीचा माझ्यावर खूप प्रभाव पडला कारण मला नेहमीच एक मानसिकदृष्ट्या मजबूत खेळाडू म्हणून पाहिले जाते, पण कधी कधी दोन पावले मागे पडून तुम्हाला शांती कुठे मिळते हे पाहणे आवश्यक असते. कोहलीने एक महिन्याचा ब्रेक घेतला होता त्यानंतर तो परतला.

धोनीच्या मेसेजमागचे कारणही कोहलीने सांगितले. तो म्हणाला, मला त्यावेळी जे वाटले होते, धोनीही एका वेळी याच टप्प्यातून गेला होता. त्यामुळे मला कसे वाटले हे त्याला माहीत आहे. 2008 मध्ये पदार्पण केल्यापासूनच कोहली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. कालांतराने दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.
