इंदोर – नवीन वर्षात म्हणजे २०१४ सालात खगोलप्रेमींना चार ग्रहणे पाहण्याची संधी असली तरी त्यातील तीन ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत असे उज्जैन येथील जीवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्र प्रकाश गुप्त यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की नवीन वर्षात १५ एप्रिलपासूनच हा ग्रहणांचा सिलसिला सुरू होत आहे.
१५ एप्रिलला वर्षातले पहिले खग्रास चंद्रग्रहण होत आहे. २९ एप्रिलला कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येऊन चंद्राची छाया सूर्यावर पडते मात्र चंद्र सूर्यापेक्षा लहान असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला न जाता कडेने बांगडीच्या आकारात सूर्याचा भाग दिसतो याला कंकणाकृती ग्रहण म्हटले जाते. हे ग्रहण अतिशय सुंदर दिसते मात्र यंदा ते भारतातून दिसणार नाही. ८ आक्टोबरला पुन्हा खग्रास चंद्रग्रहण होत असून हे ग्रहण भारतातूनही दिसणार आहे. २३ आक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असून हे वर्षातले शेवटचे ग्रहण असेल असे गुप्त यांनी सांगितले आहे.
सरत्या वर्षात म्हणजे २०१३ सालात पाच ग्रहणे झाली होती.