महाराष्ट्र पोलीस दलात आणखी एक लेटर बॉम्ब: 200 कोटींची IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी वसुली?


पुणे – सध्या राज्यासह पुण्यात माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संबंधी असलेल्या लेटर बॉम्बची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस दलात या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. 200 कोटी पेक्षा अधिक रक्कम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला असून ते पत्र थेट मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा यात समावेश आहे.

संबंधित पत्र सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी लिहिले असल्याचे सांगितले जात आहे. अर्जदार म्हणून डोंगरे यांचे नाव आहे. पण डोंगरे यांनी हे पत्र आपण लिहिले नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ते पत्र मी लिहिलेच नाही, असे सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच धमकवण्यात तो बदलावा असे ही सांगण्यात येऊ शकते, पण मी माझ्या जबाबावर ठाम असल्याचे व्हायरल झालेल्या पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.

जाणून घ्या नेमके काय म्हटले आहे मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्जदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड चे माजी पोलीस आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक श्री कृष्ण प्रकाश सर यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून, यापासून मला संरक्षण मिळावे ही विनंती. मी नऊ वर्षांपूर्वी फौजदार म्हणून पोलीस दलात भरती झालो आहे. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी माझी नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे झाली. मी बराच कालावधी हा नियंत्रण कक्ष येथे काढला आहे. श्री. कृष्ण प्रकाश सर यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यावर मी शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात माझी नेमणूक करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली होती.

तेव्हा त्यांनी मला सामाजिक सुरक्षा हे स्वतंत्र पथक स्थापन करून त्याचे प्रमुख पद दिले. निरीक्षक श्री. विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पथक काम करीत असताना आयुक्त कृष्ण प्रकाश सर यांच्या मनाप्रमाणे काम होत नसल्याचे कारण देत श्री कुबडे यांना हटवून तेथे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांना नेमण्यात आले. तर मला सामाजिक सुरक्षा पथक प्रमुख आणि वाचक शाखेचा कार्यभार सांभाळण्यास सांगण्यात आले. वास्तवात श्री. कुबडे साहेब चांगले काम करीत असतानाही त्यांना बदलण्यात आले होते.

सामाजिक सुरक्षा पथक बरोबरीने मला वाचक शाखेचे काम बघण्यास सांगण्यात आले होते. या कालावधीत शहरातील अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीची प्रकरण हाताळण्यास सांगितले जात होते. यातून मिळणारा पैसा करोडो रुपयांमध्ये असल्याने मला हे पैसे स्वीकारण्यास सांगितले जात होते. आत्ता पर्यंत आयुक्त सरांसाठी गोळा झालेली रक्कम किमान २०० कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. वास्तवात आयुक्त श्री कृष्ण प्रकाश सर यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समोर आले. पण मी पदाने कनिष्ठ असल्याने हे सगळ करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्या प्रमाणे मला इच्छा नसताना अशी काम करावी लागायची. या कालावधीत अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली. मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ठरवून करावे लागत होते. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे.

प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात आयुक्त हजर राहून महिलांची कालांतराने माहिती काढली जायची. अशाच काही महिला आयुक्तांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांनी गोळ्या केलेल्या पैशांच्या संदर्भात मला गोवण्याचा भविष्यात प्रयत्न होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे. चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत. या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे.

यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते. आत्तापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे. यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वैयक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळे मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास दिललेला नाही. त्यामुळे आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे.

मला आणि माझ्या कुटुंबाला भीती वाटत असून आपल्याकडून सुरक्षितता मिळावी ही अपेक्षा आहे. सदर अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलेच नाही असे सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, पण मी माझ्या जबाबावर ठाम असल्याचे या व्हायरल पत्रात म्हटले आहे.