नवी दिल्ली – जनलोकपालबाबत मला खोटं आश्वासन देण्यात आलं, हे जर माहिती असतं, तर मी आंदोलन मागे घेतलंच नसतं असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं. येत्या 10 डिसेंबरपासून जनलोकपालसाठी अण्णा पुन्हा आंदोलन करणार आहेत त्याबद्दलची माहिती अण्णांनी नवी दिल्लीत दिली.
प्रकृतीच्या कारणामुळे मी राळेगणमधून आंदोलन करणार आहे, असं अण्णांनी स्पष्ट केलंय. हे आंदोलन आता जनतंत्र मोर्चाच्या माध्यमातून होणार आहे. या आंदोलनात पत्रकार, कवी, साहित्यिक यांनीही सहभागी व्हावं असं आवाहनही अण्णांनी केलंय. देशात राजकीय पक्षांना सक्षम लोकपाल आणण्याची इच्छाच नाही. याबद्दल आपण पंतप्रधानांसह अनेकांना पत्र लिहिली आहेत पण तरीही अजूनही लोकपाल विधेयक आलं नाही अशी खंतही अण्णांनी व्यक्त केली. मागिल वर्षी अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी तीन वेळा आंदोलनं केली होती.