बंगळूरु – भाजपच्या सभांना मिळणा-या भरघोस प्रतिसादामुळे काँग्रेस हादरली असून त्यामुळेच सध्या माझ्यावर आणि भाजपवर काँग्रेसकडून हल्ले केले जात आहेत. भाजपचे हे यश काँग्रेसला खुपत असल्यानेच आमच्यावर निराधार आरोप करुन त्यामध्ये गुंतवण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचल्याचा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला.
बंगळुरुत नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या भारत जीतो रॅलीत भाषण केले. यात भाजपचे पूर्व प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचे कौतुक करत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आयटी क्षेत्राने भरारी घेतली. पण यूपीएची सत्ता येताच आयटी क्षेत्राची पिछेहाट सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. इस्त्रोच्या मून मिशनचा पायाही अटलबिहारी वाजपेयींच्या काळात रचल्या गेल्याचा दावाही त्यांनी केला.
चालू खात्यातील वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी यूपीए सरकार मांसाचे निर्यात करते. कत्तलखान्यांना पॅकेज दिले. त्याऐवजी सरकराने आयटी क्षेत्रासाटी पॅकेज दिले असते तर तुटही भरुन निघाली असती आणि तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळाली असती. याशिवाय गो हत्यावरही लगाम बसला असता असे मोदींनी नमूद केले. सत्ता म्हणजे वीष असल्याचे सांगत काँग्रेसने सर्वसामान्यांना सत्तेपासून दूर ठेवत एकाच कुटुंबाकडे सत्ता ठेवली असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही टीका केली.