उन्नावमध्ये सुवर्णस्वप्न स्वप्नच राहिले

उन्नाव- अखेर सीर शोभन सरकारचं स्वप्न धुळीला मिळालं आहे आणि भारताची सोन्यासाठी सुरू असणारा शोध थांबवण्यात येणार आहे. भारतीय पुरात्तव खात्याच्या सर्वेक्षण खात्याने या संदर्भात घोषणा करताना उन्नावमध्ये कुठलाही सोन्याचा साठा नसल्याचं सांगितलं आहे. सीर शोभन सरकार यांनी उन्नावच्या जमिनीखाली सोनं असल्याचं म्हटलं होतं. मात्र उत्खननानंतर सुवर्णस्वप्न भंग पावलं आहे.

18 ऑक्टोबरपासून सुरू झालेलं हे उत्खनन अखेर सोनं न आढळल्यामुळे थांबवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील दौंडिया खेडा गावानजिक राजा राव रामबक्ष सिंग यांच्या किल्ल्याच्या अवशेषांखाली 1000 टन सोनं पुरलं असल्याचं म्हणण्यात येत होतं. कडक सुरक्षे अंतर्गत उन्नाव येथे उत्खनन करण्यात आलं होतं. उत्खनना मध्ये दगड विटाच्या भिंतींचे अवशेष तसंच अन्य ढिगारा सापडला. मात्र खजिना काही मिळालाच नाही.

सीर शोभन सरकार यांना खजिन्याच्या अस्तित्वाबद्दल स्वप्न पडलं होतं. यासंदर्भात त्यांनी आपले भक्त केंद्रीय कृषीराज्य मंत्री चरण दास महंत यांना त्याबद्दल माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयाने त्यानंतर संशोधन करून उत्खननास सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात, जमिनीखाली धातू असल्याचं जाणवत होतं. मात्र 10 दिवस उत्खनन केल्यावरही काही न मिळाल्यामुळे आता उत्खनन बंद करण्यात आलं आङे.