आसारामबापूंचा सहवास नडला; पतीला समजलाच संसार मोडला!

गाजियाबाद- एकीकडे आसाराम बापू जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे त्यांच्या कृत्यामुळे एका महिलेचा संसार मोडला आहे. आसाराम बापूंची शिष्या असलेल्या एका महिलेला तिच्या पतीने सोडून दिल्याची घटना गाजियाबादमध्ये घडली आहे.

गाजियाबादच्या कवीनगर परिसरात राहणार्‍या विक्रम (बदललेले नाव) याचा विवाह अनिता (बदललेले नाव) सोबत झाला होता. पाच महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले. अनिता ही आसाराम बापूंची भक्त आहे. तिने लग्नापूर्वीचं आसाराम बापूंची दीक्षा घेतली होती. मात्र हे विक्रमला आधी माहित नव्हते.

काही दिवसांपूर्वी अनिताने विक्रमला आपण आसाराम बापूंची शिष्या असल्याचे सांगितले. मात्र आपल्या बायकोच्या तोंडून आसाराम बापूंचे नाव ऐकताच विक्रमचा पारा भडकला. त्याने अनिताशी बोलणेच टाळले. अनिता आपल्या माहेरी परतली असून तिने गाजियाबाद पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली आहे.

आता या दोघांचेे काऊंसलिंग सुरू असून त्यांचे नाते पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या, असे आरोप दोन्ही पक्ष एकमेकांवर लावत आहेत. एकूणच काय आसाराम बापूंच्या रासलिलांमुळे अशा किती अनितांचा संसार मोडणार सांगता येत नाही.