मुंबई- लालबागचा राजाच्या दर्शनसाठी मुंबईत मोठ्या संख्येने भाविक दूरवरून येत असतात. यावेळी काही कार्यकर्ते महिलांशी असभ्य वर्तन करीत असल्यारचे निर्दशनास आले आहे. हा प्रकार आगामी काळात थांबवला नाही तर कार्यकर्त्यांविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिला आहे.
मुंबईत लालबागचा राजाच्या दर्शनसाठी मोठ्या संख्येने भाविक दूरवरून येत असतात. तासनं तास रांगेत उभं राहून भाविक दर्शनाची वाट पाहत असतात. पण दर्शन घेताना भाविकांशी त्यातही महिलांशी असभ्य वर्तन केल्याचे प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पोलिसांदेखत सर्रास सुरू आहे. पण आता गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
आगामी काळात जर लालबागचा राजाचे दर्शन घेताना महिलांशी असभ्य वर्तन थांबवले नाही तर थेट विनयभंगाचे गु्न्हे कार्यकर्त्यांविरोधात दाखल करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात मंडळांना सूचना देणारी नोटीस बजावण्याचे आदेशही पाटील यांनी स्थानिक पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात अशास्वरूपाचा प्रकार करणा-या मंडळाचे धाबे दणाणली आहेत.