दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाची १७.१७ टक्के भाडेवाढ


मुंबई : इंधनदरात झालेली भरमसाठ वाढ, टायरसह गाडय़ांच्या सुटय़ा भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटीच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी अखेर महामंडळाने भाडेवाढ लागू केली आहे. भाडेवाढीच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर महामंडळाने त्याची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासूनच सुरू केली.

ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना लागू होईल. किमान ५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत ही वाढ आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किलोमीटरनंतरच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ५ रुपयांच्या पटीत ही दरवाढ असणार आहे. भाडेवाढीमुळे दादर ते स्वारगेट शिवनेरीचे तिकीट दर ४५० रुपयांवरून ५२५ रुपये झाले आहे. मुंबई ते दापोली साध्या बसचे दर २९० रुपयांवरून ३४० रुपये, मुंबई ते विजयदुर्गपर्यंत साध्या बसच्या दरात १०५ रुपयांनी वाढ असून, आता ७३० रुपये मोजावे लागतील. मुंबई ते औरंगाबाद साध्या बसचा प्रवासही १२० रुपयांनी महागला असून ७४० रुपयांवरून तिकीट ८६० रुपये झाले आहे.

इंधनाच्या दरात गेल्या तीन वर्षांत भरमसाठ वाढ झाली आहे. हे दर दिवसेंदिवस वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. एसटी महामंडळाने अशा परिस्थितीतही कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. वाढत्या इंधनदराचा बोजा सहन करत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहेत. पण, त्याचा परिणाम महामंडळाच्या तिजोरीवर जाणवू लागल्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

सुधारित तिकिटाची रक्कम आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही द्यावी लागणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. रातराणी सेवा प्रकारांतर्गत धावणाऱ्या साध्या बसचे तिकीट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसच्या तिकीट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. आता अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसचा तिकीट दर समान असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे. रातराणी गाडय़ांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत महामंडळाने रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा दिला आहे. तसेच ७५ रुपयांची वाढ मुंबई- पुणे शिवनेरी तिकीट दरात करण्यात आली आहे. १२० रुपयांनी मुंबई-औरंगाबाद साध्या बसचे भाडे वाढले आहे. मुंबई-विजयदुर्गपर्यंत बसच्या भाडय़ात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे.