चिपीच्या उद्घाटनात नारायण राणेंनी डागली राज्य सरकारवर टीकेची तोफ


चिपी – गेल्या अनेक दिवसांपासून चिपी विमानतळ उद्घाटन हा विषय चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पार्श्वभूमीवर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे याबाबत बरीच राजकीय चर्चा सुरू झाली होती. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या श्रेयावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. खुद्द नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळाचं श्रेय आमचे असल्याचे ठामपणे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर उद्घाटनाच्या भाषणात दावे-प्रतिदावे होण्याची शक्यता वर्तवली जात होती. नारायण राणेंनी यावेळी केलेल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्यांनी केलेला विकासाबद्दल सांगितले. येथे ज्या पायाभूत सुविधा तयार झाल्या, यासाठी कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नसल्याचे राणे यावेळी म्हणाले.

येथे येऊन राजकारण करू नये, असे मला वाटत होते. जावे, शुभेच्छा द्याव्यात, चिपी विमानतळावरून उडणारे विमान डोळे भरून पाहावे, या हेतूने मी आलो होतो. विमाने पाहून आनंद वाटला. मुख्यमंत्रीसाहेब मंचावर येण्यापूर्वी भेटले. माझ्या कानात काहीतरी बोलले, पण मी त्यातला एकही शब्द ऐकला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला. मला बाळासाहेब ठाकरे ९० साली म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तू जा, तुला मागणी आहे. मी निवडून आलो. हा जिल्हा मी पाहिला. जिल्ह्यातील अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्याला फेब्रुवारीनंतर पाणी नव्हते. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा होती. अनेक गावांना वीज नव्हती. यानंतर या भागाचा मी विकास केला. असे मी म्हणतो, लोक समजून घेतील, नेमके कुणी विकास केला. उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन मी हे सर्व केले.

शिवसेनेची सत्ता ९५ साली आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. देशातील एकमेव जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर येथे सर्व प्रकारच्या विकासासाठी तरतुदी करण्यात आल्या. साहेबांच्या आशीर्वादानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. गोपीनाथ मुंडेंना सांगून ब्रिज आणि रस्त्यांसाठी १२० कोटी दिले.

राज्याच्या १०वी-१२वीच्या निकालात पहिले ७-८ तरी सिंधुदुर्गचे असतात. हे श्रेय मी घेत नाही. त्यावेळी शिवसेना होती. साहेबांचे श्रेय आहे. माझे नाही. सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना तो रन्स करायचा, त्याचे क्रेडिट तो बॅटला द्यायचा. मी क्रेडिट घेतच नाही. मला सामान्यांसाठी काम करणे आवडते. उद्धवजी, एक विनंती आहे. याच जागेवर मी आणि प्रभू १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन करायला आलो होतो. तेव्हा समोर आंदोलन होत होते की भूमिपूजन होऊ देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. विरोध होत होता. किती विरोध होत होता. मी नावे घेतली तर राजकारण होईल.

अजित पवार साहेबांनी सीवर्ल्डच्या अधिग्रहणासाठी १०० कोटी रुपये दिले. पण काय झालं? कुणी रद्द केले? तिथे कोण आंदोलन करत होते? ते स्टेजवर आहेत. भांडे काय फोडायचे, किती फोडायचे? तुम्ही समजता तसे येथे नाही. तेव्हा होते, आज नाही. म्हणून परिस्थिती बदलते आहे. मला फक्त म्हणायचे आहे, तुम्ही आलात, मला बरे वाटले.

सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी येथील अभ्यास करावा. ४८१ पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा, पायाभूत संरचना कशा उभ्या कराव्यात. तुम्ही वाचावा आणि द्या त्यासाठी पैसे. धरणाला एक रुपया दिला नाही. माझ्या वेळी जेवढी धरणाची कामे झाली, त्याच्या पुढे आज काम केले गेलेले नाही. काय विकास? येथेही एअरपोर्टला पाणी नाही. विजेची लाईन नाही. ३४ कोटींचा रस्ताही नाही. कसला विकास? विमानतळ झाले, पण उतरल्यावर लोकांनी काय पाहावे? हे खड्डे पाहावेत? विमानतळाचे उद्घाटन करण्यापूर्वी हे रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीने करायला हव्या होत्या.

विमानतळाचा मालक कोण हे मला आज कळले. वीरेंद्र म्हसकर गेले आणि दुसरे आले कळलेच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत हातात माईक घेतात, म्हटले हा कार्यक्रम कुणाचा आहे? एमआयडीसीचा आहे, म्हसकर साहेबांचा आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा कळलेच नाही. कसला प्रोटोकॉल? मला कळत नाही म्हसकर साहेब आपण राजीनामा दिला की कंपनी विकली. नियमाने करा. मान-सन्मान जनता देईल.

बाळासाहेबांना खोटे बोलणे कधीच आवडले नाही. साहेबांजवळ खोटे बोलणाऱ्याला थारा नव्हता. सगळे तुम्हाला कळत आहे, पण खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय काम करत आहेत, याची माहिती गुप्तपणे कुणाला तरी नेमून घ्या. आदित्य ठाकरे माझ्या जिल्ह्यात आला. माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहे. मी काहीच बोलत नाही आणि बोलणार नाही. त्याला शुभेच्छा देईन. बाळासाहेबांना आणि सन्माननीय उद्धव ठाकरेंना कर्तबगार मंत्री म्हणून काम करून दाखवा, मला आनंद आहे.

वाईट बुद्धीने हेतूने सिंधुदुर्गात यायचे आणि परत जायचे हे सोपे नाही. चांगल्या मनाने या, निसर्गाचा आनंद सुटा. आमची हवा, निसर्ग. छत्रपतींच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पावन झाला. त्या नावाप्रमाणे आपण संकल्प करुया. किल्ल्याची डागडुजी करून दाखवा. चांगले काहीतरी करून दाखवा. नुसते महाराजांचे नाव नको, त्यांच्यासाठी केले पाहिजे. तरच त्यांचे गुण आत्मसात करण्याचा मानस होईल. जास्त बोललो. राज्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. पण मी मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. ८० टक्के उद्योग माझ्या अखत्यारीत येतात. राज्यासाठी जास्तीत जास्त उद्योग यावेत, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पुढच्या ८-१० दिवसांतच सिंधुदुर्गात सगळे येणार. समुद्रकिनारी काय उद्योग होऊ शकतात, त्यासाठी मार्गदर्शन करतील. त्यात एमआयडीसीचे सहकार्य अपेक्षित आहे.

सुजलाम सुफलाम हा जिल्हा करणे हा माझा मानस आहे. प्रयत्न कायमस्वरूपी राहतील. त्या अडचणींची मी दखलही घेत नाही. बिचारे राऊत विमानात पेढे घेऊन आले. मी थोडासा घेतला कारण डायबेटिस आहे. मी त्यांना म्हटले राऊतजी, या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. आत्मसात करा. माझी एवढीच इच्छा आहे की बोलायचे तर चांगले बोला. हसत बोला. मग लोकांना वाटते की या व्यक्तीकडे विचार आहे. विचारातून माणसांची मने जिंकता येतात, हे मी काही वेगळे सांगायची गरज नाही. मी ज्योतिरादित्य सिंदियांचे आभार मानतो. मी सांगताच त्यांनी परवानगी दिली आणि कार्यक्रमासाठी तारीख दिली. ते आज कार्यक्रमाला असते तर आनंद झाला असता.