देशात काल दिवसभरात 21 हजार 257 कोरोनाबाधितांची नोंद; तर 271 बाधितांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले जीवघेण्या कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढू लागले असल्याचे चित्र दिसत आहे. कारण काल दिवसभरात 21 हजार 257 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 271 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 40 हजार 221 वर पोहोचली आहे. जो 205 दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 50 हजार 127 लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात काल दिवसभरात कोरोना प्रतिबंधक लसीचे 50 लाख 17 हजार 753 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर लसीकरणाचा आकडा वाढून आता 93 कोटी 17 लाख 17 हजार 191 वर पोहोचला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, काल भारतात कोरोनाच्या 13 लाख 85 हजार 706 चाचण्या करण्यात आल्या.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 2,681 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 2 हजार 413 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 94 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के आहे. राज्यात काल दिवसभरात 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 818 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल दिवसभरात आर्थिक राजधानी मुंबईत 458 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,821 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4784 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1118 दिवसांवर गेला आहे.