अनिल देशमुखांचे ईडीच्या आरोपपत्रात नावच नाही


मुंबई : ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप अनिल देशमुखांची चौकशीच झालेली नसल्याचे कारण ईडीचे अधिकारी याबाबत खाजगीत बोलताना देत आहेत. अनिल देशमुख यांना या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही ते अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.

ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझेसह 14 जणांविरोधात आरोप लावण्यात आले आहेत. अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा ज्यात समावेश आहे. हे आरोपपत्र मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण तपास यंत्रणांच्या हाती हे दोघेही लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीने सीबीआयकडे मदत मागितली आहे.

पाचवेळा अनिल देशमुख यांना तर दोन वेळा त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. पण सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.