
मुंबई : वरळी किल्ला व परिसर विकास पुरातत्व संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तरित्या करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.
वरळी किल्ला व परिसराचा विकास पुरातत्व संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तरित्या करणार – अमित देशमुख
वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासंदर्भातील बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, वरळी किल्ला व परिसर विकासासाठी पुढील १० वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिका सांस्कृतिक कार्य विभागासोबत काम करणार आहे. वरळी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून सदर किल्ला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यासह मुंबईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगपालिकेकडून किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात येईल. तसेच या किल्ल्यावर विद्युतीकरण व प्रकाशझोत योजनेचे काम करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
