राज्यातील २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना एमआयडीसीकडून भरीव मदत


मुंबई – अतिवृष्टीमुळे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर, दरडी कोसळल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. दरम्यान आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली आहे. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ यांचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे.

एमआयडीसीद्वारे ज्या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची, अशी माहिती देण्यात आली आहे.

ही मदत पूरग्रस्त भागांकडे एमआयडीसीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयातून पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १००० राशनचे पाकिटे( २५ हजार किलो), २००० पाण्याच्या बाटल्या, ५५०० बँकेट्स, ५५०० टॉवेल्स पाठविण्यात आले तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली.

कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे २५ हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीने मदत दिला जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याची भावना सुभाष देसाई यांनी व्यक्त केली आहे.