दुबई – न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला हरवत विजयावर शिक्कामोर्तब केले होते. पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप संपल्यानंतर आता पुढच्या महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट २०२१पासून आयसीसीच्या दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला (WTC) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी नेमके सामने कसे होणार आहेत, याची माहिती आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केली आहे. त्याचबरोबर, यावेळी काही प्रमाणात गुण देण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. त्याविषयी देखील आयसीसीकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपासून या दोन वर्षे चालणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे.
Some cracking fixtures to look out for in the next edition of the ICC World Test Championship 🔥
The #WTC23 schedule 👇 pic.twitter.com/YXzu5lS0t1
— ICC (@ICC) July 14, 2021
२०२१ ते २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप होणार आहे. या दरम्यान प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला १२ पॉइंट दिले जातील. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ६ गुण तर सामना ड्रॉ म्हणजेच अनिर्णित झाला, तर ४ पॉइंट दिले जातील. दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला पुढील महिन्यात ४ ऑगस्टला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. पहिल्या चॅम्पियनशिपप्रमाणेच याही वेळी प्रत्येक संघाला एकूण ६ टेस्ट मॅच सीरिज खेळाव्या लागणार आहेत. यापैकी ३ इतर देशांमध्ये तर ३ स्वदेशात खेळाव्या लागणार आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या संपूर्ण दोन वर्षांच्या कालावधीमध्ये टीम इंडिया देखील ६ सीरिज खेळणार असून यामध्ये तीन सीरिज इतर देशांमध्ये खेळणार आहे. त्यात बांगलादेश, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तर भारतात होणाऱ्या सीरिजमध्ये श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरोधातील मालिकेचा समावेश आहे.