
नवी दिल्ली – : 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. यापूर्वी भारतात ही स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित केले होते. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने स्पर्धेचे ठिकाण बदलले आहे. ही स्पर्धा जरी युएईमध्ये आयोजित केली जाणार असली, तरी याचे यजमानपद भारताला मिळू शकते.
17 ऑक्टोबरपासून भारतात नव्हे तर युएईत खेळवली जाणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
काही महिन्यांपूर्वीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात सुरू असलेली आयपीएलमध्येच थांबवावी लागली. आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबरपासून युएईमध्येही खेळवले जाणार आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या काही दिवसानंतर ही आयसीसी स्पर्धा युएईमध्ये सुरू होईल. त्यामुळे येते काही महिने क्रिकेटप्रेमींसाठी खूप मनोरंजक ठरणार आहेत.
लवकरच आयसीसीला टी-20 विश्वचषक स्पर्धा युएईमध्ये हलविण्याविषयी बीसीसीआय अधिकृतपणे माहिती देईल. युएईमध्ये विश्वचषक आयोजित करण्यासाठी पूर्ण नियोजन केले गेले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
