सर्वाधिक मुले असणाऱ्या पालकांना मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस


मिझोरम – सर्वाधिक मुले असणाऱ्या पालकांना एक लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देणार असल्याचे मिझोरमममधील एका मंत्र्याने जाहीर केले आहे. हा मिझो समाजाची लोकसंख्या वाढावी असा सर्वाधिक मुले असणाऱ्या पालकांना हे बक्षीस देण्यामागील हेतू आहे. या नेत्याच्या मतदारसंघामधील बक्षीसासाठी पात्र ठरणारे पालक हे असावेत अशी अट ठेवण्यात आली आहे.

ही बक्षीस योजना मिझोरमचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रोयटे यांनी सुरु केली आहे. पण ही घोषणा करताना किती मुले असणाऱ्यांना गृहित धरले जाईल आणि कोणाला नाही याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील कायद्याची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे मिझोरममध्ये अशी घोषणा करण्यात आली आहे.

रोयटे यांनी रविवारी पार पडलेल्या फादर्स डेनिमित्त बोलताना आपल्या मतदारसंघासाठी ही योजना जाहीर केली. सर्वाधिक मुले असणाऱ्या पालकांना आपण एक लाख रुपये रोख बक्षीस देणार असल्याचे रोयटे यांनी सांगितले. फक्त अझवल पूर्व-२ या रोयटे यांच्या मतदारसंघापुरती ही योजना लागू असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बक्षीसास पात्र असणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी सुद्धा दिली जाणार असल्याचे रोयटे यांनी सोमवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

रोयटे यांच्या मुलाची बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून हे बक्षिस दिले जाणार असल्याची माहिती एनडीटीव्हीने दिली आहे. मिझो समाजाची लोकसंख्या कमी होत असून ही चिंतेची बाब आहे असेही रोयटे म्हणाले. मिझोरममधील मिझो समाजाची लोकसंख्या कमी असल्यामुळे येथील लोकांची अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली नाही. कमी लोकसंख्या ही मिझो समाजासारख्या छोट्या घटकांसमोरील मोठी अडचण असते. समाजात स्थान टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी कमी लोकसंख्या हा अशा छोट्या गटांना मोठा अडथळा ठरतो, असे रोयटे यांनी म्हटले आहे.

मिझो आदिवासी समाजातील अनेक जमाती मिझोरममध्ये वास्तव्यास आहे. काही चर्च आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मिझो समाजातील लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात टिकून राहील, यासाठी प्रयत्न करत असल्याचं रोयटे म्हणाले आहेत.

२०११ च्या जणगणनेनुसार मिझोरमची लोकसंख्या १० लाख ९१ हजार १४ एवढी होती. राज्याचे आकारमान हे २१ हजार ८७ चौरस किमी एवढे आहे. म्हणजेच प्रत्येक चौरस किमीमध्ये केवळ ५२ लोक राहतात. अरुणाचल प्रदेशानंतर मिझोरम हे सर्वात कमी लोकसंख्या घनता असणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. अरुणाचलमध्ये एका चौरस किमीमध्ये केवळ १७ लोक राहतात. देशामधील लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ प्रती चौरस किमी एवढी आहे.

पण दुसरीकडे मिझोरमच्या शेजारी असणाऱ्या आसामने वेगळे धोरण स्वीकरले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांनी सरकार हळूहळू दोन मुलांसंदर्भातील धोरण लागू करणार असून दोन मुले असणाऱ्यांना काही विशेष सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. २०१९ साली आसाम सरकारने नवीन नियम तयार केला होता. यानुसार दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना जानेवारी २०२१ पासून सरकारी नोकरी देण्यात येणार नाही. पंचायत निवडणुकांपासून सर्वच निवडणुकांच्या पात्रतेसाठी आता राज्यात दोन मुलांचे धोरण लागू करण्यात आले आहे.