संभाजीराजेंनी नाशिकमधील मूक आंदोलनाच्या सुरूवातीलाच सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना केले आवाहन


नाशिक – छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारचे मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मूक आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जाणार असून, आंदोलनाला कोल्हापुरातून सुरूवात झाली. आज (२१ जून) नाशिकमध्ये मूक आंदोलन होत असून, आंदोलन सुरू होण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली असून, राज्यभरात मूक आंदोलने केली जात आहे. पहिले मूक आंदोलन छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी झाल्यानंतर आज दुसरे मूक आंदोलन नाशिकमध्ये सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संभाजीराजे भोसले म्हणाले, समन्वयकांना आणि जे राज्यातून आलेले आहेत. जे समाजाचे घटक आहेत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे. मी एवढेच सांगेन की, आपण जे आंदोलन पुकारले आहे, ते मूक आंदोलन आहे. समाज बोलला आहे. आम्ही बोललो आहोत. आता लोकप्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करावे. ते काय जबाबदारी घेणार, हे सांगावे. त्यांना समन्वयकांनी आणि इतरांनी उलट प्रश्न करू नये. पक्षाशी संबंधित न बोलता लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय देण्यासाठी काय करू शकता, समाजाची कोणती जबाबदारी घेणार, हे सांगावे. कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही, अशी भूमिका यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली.

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने राज्यभर मूक आंदोलन सुरू केले आहे. यातील पहिले आंदोलन बुधवारी कोल्हापुरात पार पडले. या आंदोलनास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाची दखल घेत सरकारने आंदोलकांना चर्चेसाठी पाचारण केले होते. यावेळी संभाजीराजेंनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असून लवकरच या मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली होती.

तसेच या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखालील समिती समन्वयाचे काम करील. त्याचबरोबर आपण स्वत: हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी बैठका घेऊ, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती सकल मराठा समाजास केली होती. पण, संभाजीराजे यांनी या भेटीनंतर आंदोलन सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.