तृणमुल प्रवेशानंतर केंद्राकडून मिळालेली सुरक्षा मुकुल रॉय यांनी सोडली


कोलकाता – नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये मुकुल रॉय यांनी प्रवेश केल्यानंतर २४ तासांच्या आतच मुकुल रॉय यांनी केंद्राकडून देण्यात आलेली सुरक्षा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या पोलिसांची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुल रॉय यांच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील कांचरापारा येथील निवासस्थानी शुक्रवारपासूनच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

याबाबत राज्य सचिवालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून झेड दर्जाची मुकुल रॉय यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. परंतु अधिकृतरित्या या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. मुकुल रॉय यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यानंतर बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती.

केंद्राकडून मिळणारी सुरक्षा सोडल्याची माहिती मुकुल रॉय यांनी स्वत: दिली आहे. दरम्यान, शनिवारी रॉय यांना त्यांची सुरक्षा काढून घेतली जाणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी याची आपल्याला कल्पना नसून आपणच सुरक्षा सोडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांनी भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान तृणमूल भवन आणि त्यांच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली होती.