देशात काल दिवसभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भारतात पाहायला मिळत आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना देखील दिसत आहे. पण दररोज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा समोर येणारा आकडा भयावह आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 6148 कोरोनाबाधितांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक लाख 51 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजचे, काल दिवसभरात 63,463 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 92,596 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

देशात सलग 28व्या दिवशी आज कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 9 जूनपर्यंत देशभरात 24 कोटी 27 लाख 26 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर काल दिवसभरात 33 लाख 79 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 37 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे.

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.22 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 94 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 5 टक्क्यांच्या कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर एकूण बाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधित मृत्यू भारतात झाले आहेत.

राज्यात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल 10 हजार 989 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 16 हजार 379 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात 10219 रुग्णांची नोंद झाली होती.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,97,304 एवढी झाली आहे, तर रिकव्हरी रेट 95.45 टक्के झाला आहे. काल 261 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल एकूण 1,61,864 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यातील पाच महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात 10 पैक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 788 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर काल मुंबईत 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 80 हजार 520 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्के आहे. सध्या मुंबईत 15 हजार 947 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 553 दिवसांवर गेला आहे.