चक्रीवादळाच्या वेगालाही लाजवेल असा मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा; संदीप देशपांडेंची खोचक टीका


मुंबई : चक्रीवादळाच्या वेगालाही लाजवेल असा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा होता, पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना संदीप देशपांडे हे म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्री साहेब तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरंच तुम्ही बेस्ट सीएम आहात.

मुख्यमंत्र्यांवर मी ट्विटमधून टीका करत नाही, तर वस्तुस्थिती सांगत आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. तोक्ते चक्रीवादळ 140 ते 160 किमी वेगाने आले. आता मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अंतर किती आहे? मुख्यमंत्री किती वेळात सिंधुदुर्गला जाऊन मुंबईला परतले? असा सवालही त्यांनी केला. गुजरातच्या पुढे पंतप्रधानांना काही दिसत नाही, मुंबई महापालिकेच्या पुढे मुख्यमंत्र्यांना काही दिसत नाही आणि दोघांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला भविष्य दिसत नसल्याचा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री हे वर्ल्ड बेस्ट सीएम आहेत आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे असे सांगत संदीप देशपांडे म्हणाले की, तुम्हाला वाटते की मी टिका करत आहे, पण खरच मी कौतुक करत आहे. मुख्यमंत्री कोकणात गेले, त्या ठिकाणच्या लोकांच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या असतील. रत्नागिरीत तर जिल्हाधिकाऱ्यांकडूनच लोकांच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या आहेत.

एवढ्या चांगल्या प्रकारे मुंबई पॅटर्न राबविला की लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोरोना तर सोडाच लोकांचा आगीतही होरपळून मृत्यू झाला. जगात एवढा चांगला पॅटर्न कुठे राबविला गेला असेल अशी उपहासात्मक टीकाही संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर केली. धारावीतील परप्रांतीय सध्या आपापल्या राज्यांत गेले आहेत. तेथील लोकसंख्या कमी झाली असल्यामुळेच धारावीतील रुग्णसंख्या कमी झाली असून परप्रांतीय जेव्हा परत येतील तेव्हा या पॅटर्न बद्दल बोलूया, असे संदीप देशपांडे म्हणाले.