आघाडी सरकारमधील सिंचनपेक्षा वीज घोटाळा मोठा – भाजपाचे माधव भंडारी

मुंबई, दि. 2१ (प्रतिनिधी) – पाटबंधारे खात्यातील 70 हजार कोटी रु. घोटाळ्यापेक्षा आघाडी सरकारमधील वीज घोटाळा प्रचंड मोठा असून महाजनको खत्यारीतील 10 प्रकल्प रेंगाळल्यामुळे 8616 कोटी रु. किंमत वाढल्याचा आरोप भाजप प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आपण दर आठवड्याला एक असा वीज घोटाळा उजेडात आणू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. हा सर्व खर्च बाहेरून वीज जास्त घेण्याच्या हव्यासातून वाढला. कारण प्रति एक युनिटमागे संबंधितांना 14 पैसे प्रमाणे कमिशन मिळते, ते सतत मिळत राहावे, म्हणून राज्याची निर्मिती क्षमता असतानाही प्रकल्प रखडवले जातात,
अशी धक्कादायक माहितीही त्यांनी दिली. महाजनको भांडार अधिकारीपदी असणारे सी. एस. थोटवे यांना पात्रता नसतानाही व निवड समितीचा अहवाल प्रतिकूल असतानाही कार्यकारी निर्देशक निर्मितीपदावर घेण्यात आले. परिणामी 23 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे 4570 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प रखडून त्यांचा
खर्च 8616 कोटींनी वाढला, असे ते म्हणाले.

या अनुभवशून्य कार्यकारी निर्देशकांच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांकडे आमदारांनी तक्रारी केल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचाही समावेश आहे. राज्यातील वीज प्रकल्पांचा खर्च रखडल्यामुळे वाढला. याबाबत केंद्रीय ऊर्जा सचिवांनीही 17 जून 2011 रोजी मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे चिंता व्यक्त केली व चौकशी करण्यास सुचविले. तरीही राज्य सरकारने दखल घेतली नाही. असे ते म्हणाले.

तत्कालीन ऊर्जा सचिव सीताराम कुंटे यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते, त्याचे काय झाले, असा सवाल भंडारी यांनी केला. ज्यांची मुदत संपली अशा अधिकार्‍यांना सात महिने अतिरिक्त कार्यभार का दिला व जे इतर काही महाजनकोत जागा अडवून बसले आहेत, त्यांना पाठीशी कोण घालतो त्याचे उत्तर द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.