‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदीची अंधश्रद्घा निर्मूलन समितीची मागणी

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – ‘पीओपी’च्या गणेश मूर्तींचे पाण्यात विघटन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. ‘पीओपी’ऐवजी शाडूच्या मूर्ती तयार केल्यास त्या पाण्यात विरघळतात. त्यामुळे पर्यावरण खात्याने जिल्हाधिकार्‍यांमाफत सर्व जिल्ह्यातील मूर्तीकारांना ‘पीओपी’च्या मूर्ती व रासायनिक रंग वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा प्रसार व्हावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे येत्या जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र ‘त्रिसूत्री’ या नावाने समविचारी संघटनांच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहेत. कोल्हापूर येथून मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. याविषयी ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

नागपूरचे उदाहरण देत दाभोलकर म्हणाले, नागपूर महापालिकेने शहरातील कारखानदारांना प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ऐवजी शाडूच्या मूर्ती तयार करण्याचे आवाहन केले आहे. याला नागपूर न्यायालयाने पाठिंबा दर्शवला आहे. तसेच न्यायालयाने प्रदूषण करणार्‍या रासायनिक रंगांवर बंदी घालण्याबाबत स्पष्ट आदेश दिला आहे. या आदेशाच्या योग्य अंमलबजावणीची गरज आहे. राज्यात 8 हजार 500 शाळांमध्ये ‘इको क्लब’ आहेत. त्या अंतर्गत पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती मुलांना तयार करण्यास दिल्या, तर त्यामुळे नदी प्रदूषण होणार नाही, असेही दाभोलकर म्हणाले.