अदर पूनावाला यांच्या सुरक्षेवरुन मोदी सरकारला नाना पटोलेंचा सवाल


मुंबई – सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांना सुरक्षा देण्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतात अदर पूनावाला नसताना आणि राज्य किंवा केंद्र सरकारकडे तसा कोणता अर्ज त्यांनी केलेला नसतानाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा कसे काय देऊ शकते? अशी विचारणा मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी केली आहे. यामागे काय लपले आहे हे वास्तव समोर आले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही पटोले म्हणाले आहेत.

टाईम्स युकेला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्र्यांपासून उद्योजकांपर्यंत सगळ्यांचे धमक्यांचे फोन येत असल्याचा खुलासा अदर पूनावाला यांनी केला आहे. यासंबंधी विचारण्यात आले असता, आपल्याला देशातील मोठ्या नेत्यांनी धमकावल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेते असूच शकत नसल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

अदर पूनावाला यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. अजून सुरक्षा हवी असेल तर दिली जाईल. काँग्रेसही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण त्यांनी धमकावणारे हे नेते कोण आहेत, हे अदर पूनावाला यांनी जाहीर करावे, असेही ते म्हणाले. राज्याच्या जनतेसोबत देशातील जनतेचे लसीकरण होणे ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे यावेळी पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले लसीच्या दरासंबंधी बोलताना म्हणाले की, देशातील निर्माण झालेल्या अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्व जबाबदारी घ्यायला हवी होती. पण पंतप्रधानांनी राज्यांना जबाबदारी घेण्यास सांगितले. त्यावेळी दर निश्चित करण्यात आले. पण जगात कुठेही एकाच गोष्टीचे तीन वेगळे दर असू शकत नाही. पण मोदी है, तो मुमकीन है असेच दिसत आहे. रेमडेसिविर सरकारने खुल्या बाजारात आणले असते, तर काळाबाजार झालाच नसता असे देखील त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशातील लोकांचे जीव जात आहेत. केंद्रातील सरकार सातत्याने लोकांच्या जीवाचे राजकारण करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.