यामुळे मनसुख हिरेनची सचिन वाझेंनी केली हत्या – एनआयए


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासातून आणखी एक महत्वपूर्ण बाब समोर आली आहे. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या मुद्दा गाजत असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. आता हळूहळू हिरेन यांच्या हत्येमागील कारणांचा उलगडा होत असून, एनआयएच्या तपासातून नवी माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी तपासाबद्दलची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे. स्फोटके असललेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलियाजवळ आढळून आली होती. मनसुख हिरेन या गाडीचे मालक होते. गाडी चोरीला गेल्याचे हिरेन यांनी म्हटले होते. पण गाडी चोरीला गेली नाही, तर हिरेन यांनीच गाडीची चावी वाझे यांना दिली होती, असे तपासातून समोर आले आहे.

अद्याप हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. पण प्राथमिक दर्शनी असे दिसत आहे की, गळा दाबून नव्हे तर श्वास कोंडल्याने हिरेन यांचा मृत्यू झालेला आहे. अशा कोणत्याही खुणा त्यांच्या मृतदेहावर आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालातून हे निश्चित होईल. जेव्हा त्यांचा मृतदेह वाहून आला, तेव्हा त्यांच्या तोंडातून अनेक हातरुमाल बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडीची चावी स्फोटकांनी भरलेली गाडी आढळण्यापूर्वी वाझे यांना दिली होती. त्यानंतर हिरेन यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कार चोरीला गेल्याची तक्रार केली होती. दरम्यान, हिरेन यांच्या हत्येत सहभागी नसल्याचे वाझेंकडून सांगितले जात असले, तरी त्यांच्याविरुद्ध पुरावे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या प्रकरणात कॉल डेटा रेकॉर्ड, हत्येत सहभागी असलेल्या लोकांचं लोकशन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुराव्यातून सहभाग असल्याचे दिसून येते. मिठी नदीत मिळालेल्या ईलेक्ट्रॉनिक साधनांमधूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळून आल्यानंतर हिरेन यांच्यावर वाझेंकडून गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाब आणला जात होता. एनआयएकडे अंबानी स्फोटके प्रकरणाचा तपास सोपवण्यासाठी विरोधकांकडून सरकारवर दबाब आणला जात होता. त्याच काळात एटीएसकडे हे प्रकरण जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे हिरेन प्रकरण स्वतःच्या नावावर घ्यायला तयार नव्हते. एनआयएकडे तपास जाण्याच्या भीतीने वाझे घाबरले होते. त्यातून त्यांनी हिरेन यांची हत्या केली गेली. आता आम्ही हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी वाझे तिथे होते का? याचा तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.