काँग्रेसच्या हिश्श्याची विचारणा करणाऱ्या फडणवीसांना नाना पटोलेंनी दिले उत्तर


मुंबई – राज्यातील भाजप नेते सध्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन आक्रमक झाले असून राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने फोन टॅपिंग प्रकरणी आज सकाळी राज्यपालांची भेट घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत, काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असल्याची टीका केली होती. त्याचबरोबर यात काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे असेही म्हटले होते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या या टीकेला उत्तर दिले आहे.

नाना पटोले यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, असा भाजपला टोला लगावला. फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने वाटा आणि घाटा हे पाहिले आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोक कशी प्रत्येक मंत्रालयात होती, आरएसएसचे किती लोक फडणवीसांच्या मंत्रालयात होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर मी चर्चा करणार आहे. भ्रष्टाचारात जे गुंतले आहेत, तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभे केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केला. पण देश विकून ते चालवणारी लोक काँग्रेसला वाट्याचे सांगत असतील तर जे पाप फडणवीस सरकारमध्ये झाले ते राज्य सरकारने उघडकीस आणावे. कोणाच्या पे रोलवर परमबीर सिंह होते हे सर्वांना माहिती असल्यामुळे त्यामुळे भाजपवाले वाटा कसा घेतात, हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असे नाना पटोले यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून वंचित भारतीय, महागाई मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही व्यूहरचना रचल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना केंद्राकडून अजूनही अपुऱ्या पद्धतीने लस पुरवली जात आहे. केंद्रातील सरकार एकीकडे पाकिस्तान धार्जिणी होऊन पाकिस्तानला लस पुरवते, पण महाराष्ट्राला आणि देशातील गरीबाला लस दिली जात नाही. भाजपकडून या मूळ प्रश्नांवरुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असून राज्य सरकारने हे गांभीर्याने घ्यावे अशी काँग्रेसची भूमिका राहणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून राजभवन भाजप कार्यालय झाले आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा, जो ठेका घेतला आहे त्यासाठी जनता माफ करणार नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

स्वत: फडणवीस न्यायाधीश झाले होते. ते त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाही? राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणे चुकीचे आहे. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका आहे. आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्यासाठी चांगले झाले, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

परमबीर सिंह दोषी आहेत की अनिल देशमुख हे तपासावे लागेल. उद्धव ठाकरे फडणवीसांप्रमाणे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्यांना मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मनमोहन सिंग बोलत नव्हते तेव्हा न बोलणारे पंतप्रधान अशी टीका झाली. आता पंतप्रधान बोलका भेटल्यानंतर देशाचे काय झाले पाहिले ना. मुख्यमंत्री असताना फडणवीसच बोलत होते, तेच प्रवक्ते आणि मुख्यमंत्री होते. तो स्वभाव उद्धव ठाकरेंचा नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी आणि केव्हा काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. विरोधी पक्षनेत्याने सांगावे आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे काही धोरण केंद्राने ठरवले आहे का ? लोकशाहीत प्रत्येकाचा वेगळा स्वभाव असतो. न्यायाधीश आणि प्रवक्त्यांची भूमिका फडणवीस निभावत होते, तो त्यांचा प्रश्न होता.

जर सरकारमध्ये मी असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केले असते. त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात जावे की उच्च न्यायालयात जावे हा त्यांचा प्रश्न आहे. हे सगळे मोहन डेलकर प्रकऱणानंतर सुरु झाले. चौकशी अजूनही सुरु नाही. आम्ही दबाव आणला. गुन्हे दाखल होणार नाही असे हे आयुक्त सांगत होते. या पद्दतीने वागणारे अधिकारी मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी असतील तर मी राहिलो असतो तर बदली केली नसती निलंबितच केले असते, असे नाना पटोले म्हणाले आहेत.