मागील साडे सहा वर्षांपासून लादण्यात आलेला अतिरिक्त ‘मोदी टॅक्स’ हटवला जावा; काँग्रेसची मागणी


नवी दिल्ली – काँग्रेसने मोदी सरकारवर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरुन निशाणा साधला आहे. देशातील फक्त दोन उद्योजकांसाठी मोदी सरकार काम करत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल करताना देशातील नागरिक अबकारी कराच्या रुपात ‘मोदी टॅक्स’ भरत असल्याचे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मागील साडे सहा वर्षांपासून लादण्यात आलेला अतिरिक्त ‘मोदी टॅक्स’ हटवला जावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

सरकारने अबकारी कर जर कमी केला तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर ६१ रुपये ९२ पैसे तर डिझेलचा दर प्रतिलीटर ४७ रुपये ५१ पैसे एवढा होईल असा दावा पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला. कच्च्या तेलाची किंमत मे २०१४ मध्ये प्रत्येक बॅरेलमागे १०८ डॉलर एवढी होती. त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचा दर ७१ रुपये ५१ पैसे एवढा होता. तर कच्च्या तेलाची किंमत १ फेब्रुवारी २०२१ला प्रत्येक बॅरेलमागे ५४.४१ डॉलर असतानाही राजधानीत पेट्रोलचा दर मात्र ८९ रुपये २९ पैसे एवढाच आहे. तर डिझेलचा दर प्रतिलीटर ७९ रुपये ७० पैसे एवढा असल्याचे पवन खेरा यांनी सांगितले.

मोदी सरकारने इंधनांच्या किंमतीतून देशाचे २० लाख कोटी लुटले असल्याचा गंभीर आरोप पवन खेरा यांनी यावेळी केला. ते २० लाख कोटी कुठे गेले? ते कोणत्याही क्षेत्रात दिसले नाहीत. आपल्या काही मित्रांचा फायदा व्हावा यासाठी हा केलेला गुन्हेगारी कट होता, असे म्हणू शकतो का?,” अशी संतप्त विचारणा यावेळी त्यांनी केला. तसेच आपली कमतरता लपवण्यासाठीच केंद्र सरकार असे वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.