शिवसेनेमध्ये होती भाजपने विश्वासघात केल्याची भावना; रोहित पवारांचा फडणवीस, अमित शहांना टोला


अहमदनगर : नारायण राणे यांच्या प्रयत्नांनी साकारण्यात आलेल्या त्यांच्या वैद्यकिय महाविद्यालयाचा उदघाटन, लोकार्पण सोहळा रविवारी सिंधुदुर्गात पार पडला. भाजपच्या बड्या नेत्यांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. या वास्तूचे उदघाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीवर व्यासपीठावर आलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्याने निशाणा साधला. शिवसेनेवर नारायण राणे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तोफ डागली.

शिवसेनेच्या वाटेवर भाजप चालली असती तर महाराष्ट्राच शिवसेना उरलीच नसती. असे भुवया उंचावणारे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्याचबरोबर दिलेली वचने आम्ही पाळतो, असे म्हणत त्यांनी सत्तास्थापनेची बिघडलेली समीकरणे पुन्हा एकदा सर्वांसमोर मांडली. राजकीय वर्तुळातून त्यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ज्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही शहा आणि फडणवीसांना महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्याबाबत प्रत्युत्तर दिले आहे.

मुळात अमित शहा यांचे वक्तव्य हे व्यक्तीगत होते. भाजपमधील कोणाच्याही पचनी महाविकासआघाडी सरकार पडले नाही. शिवाय मागील अनेक वर्षांपासून युतीत असतानाही शिवसेनेत भाजपने विश्वासघात केल्याची भावना असल्चाचे ते म्हणाले. जनादेशाचा अनादर करुन महाविकासआघाडी सरकार हे प्रस्थापित करणाऱ्या शहांना उत्तर देत हे सरकार, महाविकासआघाडी ही लोकहितासाठी झाल्याचे आश्वासक वक्तव्य त्यांनी केले. या एकंदर प्रकरणातून देशांमध्ये एक वेगळा संदेश गेला आणि देशातील भाजपच्या स्थानिक मित्र पक्षांनी भाजपबद्दल बोलताना आवाज वाढवल्यामुळे शहा असे बोलले असतील, असे ते म्हणाले.

पहिल्या दिवसापासून फडणवीस महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे म्हणत होते. पण सरकार अजूनही टीकून असल्यामुळे दर तीन महिन्याला ते सरकार पडणार असे सांगतात, आपले आमदार जाऊ नये या भीतीने असे बोलले असावेत, असा टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला.