
मुंबई – गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यांपासून कोरोना संकटामुळे बंद असणारी मुंबईकरांची लाईफलाईन ठरलेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे सरसकट सर्वांना एकाच वेळी रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी चर्चा यावेळी झाली.
मुंबईकरांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
यादरम्यान महत्वाचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. २९ जानेवारीपासून मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत अतिरिक्त २०४ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या २७८१ वरुन २८९५ वर पोहोचणार आहे. लोकल फेऱ्यांची संख्या मध्य रेल्वेने १५८० वरुन १६८५ तर १२०१ वरुन १३०० वर नेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
दरम्यान सर्वसामान्यांना रेल्वेतून प्रवास करु देण्यासंबंधीचा निर्णय अद्याप झालेला नसल्यामुळे रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. इतरांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना कोरोना नियमावलीचे पालन करण्यासही सांगण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबई विभागाने सर्व उपनगरीय सेवा सुरु करण्यासंबंधी विनंती मिळाल्याचा उल्लेख आहे. तसेच २९ जानेवारीपासून सर्व सेवा सुरु करण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे. यावरुन २९ जानेवारीपासून सर्वांना लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पण सोशल मीडियावर या फोटोचा चुकीचा संदर्भ जोडल्याचे समोर आले. लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा उल्लेख यामध्ये असून प्रवाशांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
