नवी दिल्लीः आगामी काळात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी , ७ वनडे आणि २ टी २० क्रिकेट सामने खेळणार आहे . या वर्षअखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर रवाना होणार असून दरबान , केप टाऊन , जोहान्सबर्ग अथवा सेंच्युरियन येथे कसोटी सामने होतील .
गेल्या वर्षीच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौ -यावर आला होता. डरबानची कसोटी बॉक्सिंग डे ( २६ डिसेंबर ) पासून खेळवण्यात येईल. त्यानंतर बाकी सामने खेळले जाणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात टीम इंडियाला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविण्याची संधी चालून आली आहे.
त्यासोबतच २०१४ मध्ये होऊ घातलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून भारताने माघार घेतल्यामुळे आता या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. २०१२ मध्ये झालेल्या आशिया कपचे यजमानपद बांग्लादेशकडे होते. २४ फेब्रुवारी ते ८ मार्च २०१४ या काळात ही स्पर्धा खेळली जाण्याची शक्यता आहे.