शेतकऱ्यांच्या हिताचे तसेच न्याय देण्याचे कोणतेही काम सध्याचे ठाकरे सरकार करु शकत नाही


मुंबई – ठाकरे सरकार नव्या कृषी विधेयकांविरोधात आक्रमक झाले असून तिन्ही पक्षांचे मुख्य नेते मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी आंदोलन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान भाजप खासदार नारायण राणे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी नवी कृषि विधेयके आणली आहेत. हे राजकीय आंदोलन आहे. प्रचारादरम्यान हेच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचे पुढे काय झाले? किमान १० हजार तरी द्यावेत. सध्याचे ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे तसेच न्याय देण्याचे कोणतेही काम करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचेही तसेच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली असल्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे एकही काम या सरकारने वर्षभरात केलेले नाही, आता पुळका आला आहे. शरद पवारांनी ते बिल आता वाचले असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचे आहे का ? मग विरोध कशाला? मातोश्रीत नेऊन धान्य आणि भाज्या विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचे कुठे?, अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदींनी कायदा केला असून शेतकरी खूश आहेत. फक्त राजकीयदृष्ट्या भाजपच्या विरोधातील लोक एकत्र आले आहेत. जे यश भाजपला मिळत आहे ते पाहवत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन सुरु असल्याचा टोला नारायण राणे यांनी लगावला.

ग्रामपंचायत निवडणुकीत सगळे पक्ष आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करत आहेत. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, भाजपचा दावा खरा असतो आणि आहे. जी माहिती भाजप देते ती खरी असते. त्यासाठी आम्हाला हेराफेरी करण्याची गरज नाही. आमचे सदस्य फिरवण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. तसे केले तर गंभीर परिणाम होतील.

औरंगाबादच्या नामकरणावर बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब वरुन पाहत असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील. बाळासाहेबांनी औरंगाबादमध्ये संभाजीनगर म्हणून जाहीर केले होते. मुलगा मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही हे दुर्दैव आहे. साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रीपद मोठे वाटते. एक तर लाचारी करुन पद मिळवले, त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. औरंगाबादचे संभाजीनगर जाहीर करायचे सोडून टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत. ही शिवसेना नाही. आम्ही होतो, ती वेगळी आणि आत्ताची शिवसेना वेगळी आहे.

मुख्यमंत्री जरी असले तरी सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान, अभ्यास नाही. गाडी चालवायची माहिती असेल पण सरकार चालवण्याचा अभ्यास नसल्यामुळे सरकार पुढे जात नाही. सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.