ईडीची वाट न पाहता राज्य सरकारने त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी – फडणवीस


सोलापूर – राज्यातील वातावरण शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर ईडीने मारलेल्या छाप्यावरून पुन्हा एकदा तापलेले आहे. यावर महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार कितीही प्रयत्न केला तरी हे शरण जाणार नाहीत. सुरुवात तुम्ही केली तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती असल्याचा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. तर बेईमानी करून आलेले सरकार पडले की आम्ही पर्याय देऊ, असे आव्हान देत देवेंद्र फडणवीस यांनी मनसे युतीबाबतही भूमिका मांडली आहे.

ईडीने शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. कधी भाजप नेत्यांच्या घरी ईडीने छापा टाकल्याचे मी ऐकलेले नाही. १०० माणसांची यादी मी ईडीला देतो. त्यांच्यावर ईडीने कारवाई करून दाखवावी, असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केले. १०० लोकांची यादी राऊत यांनी माझ्याकडे द्यावी. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द असल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपला शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

ईडीची वाट न पाहता राज्य सरकारने त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले आहे. राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, विरोधी पक्षात आम्ही काम करत आहोत. पण, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. हे सरकार ज्या दिवशी जाईल त्यादिवशी आम्ही पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले. आगामी काळात मनसेला सोबत घेणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.