नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुलतान अहमद यांनी सलमान रश्दी आणि तस्लीमा नसरीन यांना पश्चिम बंगालमध्ये घुसू देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कोलकातामध्ये येण्यापासून रोखले; असा आरोप रश्दींनी नुकतांच केला होता. रश्दींच्या या आरोपामुळे मोठा वाद झाला होता.
रश्दींना रोखण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगत अहमद म्हणाले की; त्यांना बोलावणे म्हणजे जनतेच्या विरोधात जाण्यासारखे आहे. बंगालची जनता रश्दी आणि तस्लीमांना पसंत करीत नाही. बकिंम चंद्र चॅटर्जी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीवर या लोकांना कधीच येऊ देता कामा नये. आमच्या देशाने अनेक महान लेखक दिले. परंतु एखाद्या जातीला, धर्माला शिवी देणा-याला आम्ही मोठा लेखक कसा मानू शकतो; असा सवाल करून; त्यांच्यावर बहिष्कार टाकलाच पाहिजे; असे अहमद यांनी नमूद केले.
रश्दी यांच्या सॅटनिक व्हर्सेस या वादग्रस्त कांदबरीवर भारतात 1988 मध्ये बंदी घालण्यात आली. सन १९८९ मध्ये इराणचे धार्मिक नेता अयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या विरोधात जीवे मारण्याचा फतवा जारी केला होता.
सन २०१२ मध्ये मुस्लिम संघटनांच्या विरोधामुळे रश्दींना जयपूर साहित्य महोत्सवात सामील होता आला नव्हते. बांगलादेशाच्या लेखिका तस्लीमा नसरीन त्यांच्या लज्जा या कांदबरीमुळे वादात अडकल्या होत्या. या कांदबरीमुळे त्यांना बांगलादेश सोडावे लागले. त्या अनेक वर्षे कोलकाता येथे राहिल्या. मात्र मुस्लिम संघटनांच्या विरोधामुळे त्यांना हे शहर सोडावे लागले.