गेहलोत सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव


जयपूर – काही दिवसांपूर्वी सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे अस्थिरतेच्या सकंटाला सामोरे गेलेल्या अशोक गेहलोत सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला असून पक्षात सचिन पायलट यांच्या वापसीनंतरच गेहलोत सरकारसमोरील संकट टळले होते. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान घेण्यात आले. दरम्यान २१ ऑगस्टपर्यंत विधानसभा अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. सचिन पायलट यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आपण चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. अनेक प्रयत्न विरोधकांनी करुनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागल्याचेही ते म्हणाले.

सचिन पायलट यांचे बंड गांधी कुटुंबियांची भेट घेचल्यानतंर शमले आणि अशोक गेहलोत यांच्यासमोरील संकटही टळले. दोन्ही नेत्यांनी गुरुवारी एकमेकांची भेट घेत समेट झाल्याचेही दर्शवले होते. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, गेहलोत सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचे भाजपने जाहीर केले होते.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान काहीही झाले तरी आपण राज्य सरकार पडू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी भाजप सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला. कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात जे झाले त्याची चिंता तुम्ही लोकांनी केली पाहिजे. देशभर लोकशाहीची खिल्ली उडविली जात आहे.

नेहमी निवडून आलेली सरकारे कशी पाडावी याचीच स्वप्ने अमित शहा पाहत असतात. पण हे सरकार आम्ही पडू देणार नसल्याचेही अशोक गेहलोत यांनी यावेळी सांगितले. तुमचे पक्षप्रमुख किंवा हाय कमांड यांनी कितीही प्रयत्न केले, तरी मी हे सरकार पडू देणार नसल्याचे यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले.