नाशिक पोलिस अॅकॅडमीवर हल्ल्याची होती योजना

नवी दिल्ली दि.३-जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल याने भारतीय सुरक्षा संस्थांकडे चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीत त्यांची नाशिक पोलिस अॅकॅडमीवर हल्ला करण्याची योजना होती असे मंगळवारी कबूल केले आहे. लाहोर येथील पोलिस अॅकॅडमीवर २००९ साली जसा हल्ला केला तसाच हल्ला नाशिक पोलिस अॅकॅडमीवरही करण्यात येणार होता आणि या हल्ल्यासाठी लष्करे तैयबाचा बाबा रेहमान शेख मार्गदर्शन करणार होता असे अबूने चौकशीत सांगितले आहे.

अबूने यावेळी मुंबईवर केलेल्या २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी कराचीतील नियंत्रण कक्षात मेजर जनरल हुद्द्याचा पाकिस्तान आयएसआयचा अधिकारीही उपस्थित होता असेही सांगितले आहे. त्याचबरोबर लष्करे तैयबाचे ऑपरेशनल कमांड हेडक्वार्टर पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते ते मुंबई हल्ल्यानंतर दोलाई येथे हलविण्यात आल्याचेही त्याने कबूल केले आहे. तसेच लखवीच्या अटकेनंतर मुझमील भट लष्करे तैरबाचा ऑपरेशन प्रमुख म्हणून नेमला गेला असल्याची माहितीही त्याने दिली आहे.

अबूच्या या जबाबामुळे दक्षिण आशियातील या देशात नवीन तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून या दोन अण्वस्त्रधारी देशात स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षात आत्तापर्यंत तीन युद्धे खेळली गेली आहेत याकडेही जाणकार लक्ष वेधत आहेत.