दोन जुलैपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

ठाणे, दि. १९ – मराठी  शाळांना वेतनेतर अनुदान मिळत  नसल्याने संस्थाचालकांनी येत्या २ जुलैपासून शाळा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. शाळा बंद ठेवणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. राज्य सरकारने २००४ पासून वेतनेतर अनुदान बंद करुन संस्थाचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राज्यातील ३०-३५ हजार शाळा बंद पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई -ठाण्यासारख्या शहरात मालमत्ता करात प्रचंड वाढ झाली आहे; तर महावितरणाने शाळांचा व्यवसायिक गटात समावेश केल्याने वीजबिले भरताना शाळाचालकांच्या नाकीनऊ येत आहे. तसेच, रात्रशाळांची अवस्था भयावह असल्याने सरकारने या प्रश्नी तात्काळ लक्ष घालून वेतनेतर अनुदान सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी केली आहे.