
जगन्नाथ पुरी दि.१९- उद्यापासून म्हणजे दि.२० पासून २२ तारखेपर्यंत पुरीत जगन्नाथ रथयात्रेचा सोहोळा पार पडत असून या सोहळ्यासाठी जगन्नाथ,बलराम आणि सुभद्रा पूर्ण स्वस्थ म्हणजे ठणठणीत झाले आहेत. वाचून थोडे नवल वाटते काय? पण मग हे कळायलाच हवे. जगभरात ज्या रथयात्रेचे कुतुहल जनमानसात आहे, त्या जगन्नाथ रथयात्रेअगोदर १५ दिवस देव दरवर्षी आजारी असतात.ज्येष्ठी पौर्णिमेपासून सुरू होणारा हा आजार रथयात्रा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण बरा झालेला असतो. वर्षातून एकदाच या देवांचा स्नान समारंभ होत असल्याने हे स्नान झाले की देवांना थंडी,ताप भरतो. मग पंधरादिवस मंदिराची दारे बंद होतात आणि देव विश्रांती घेतात.
