आर्थिक सुधारणांच्या नावावर देश रसातळाला नेण्याचा कट – मुरली मनोहर जोशी

दिल्ली, दि. ११ – आर्थिक सुधारणांच्या नावावर देशाला रसातळात नेण्याचा कट केंद्र सरकारकडून रचला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी केला आहे. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक करणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशी कृती करणे हे सर्वसामान्य जनतेच्या विरूद्ध कुटील कारस्थान आहे, असे सांगून ते म्हणाले, विदेशी गुंतवणूक, महागाई, पेट्रोलची दरवाढ आणि केंद्र सरकारच्या अन्य लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ येत्या २२ जून रोजी भाजपा देशव्यापी आंदोलन करणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या व्यापार विभागाच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. जोशी म्हणाले की, मनमोहनसिंह सरकार हे जनतेच्या हिताच्या विरूद्ध काम करणारे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे आहे. काही मोठी औद्यगिक घराणी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर नाचणारे हे सरकार आहे. या सरकारला सर्वसामान्यांच्या हिताशी काही देणेघेणे नाही. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस परवानगी दिल्यास छोटे व्यापारी आणि शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तसेच सर्वसामान्य जनतेलाही अशा गुंतवणुकीमुळे नुकसान सोसावे लागेल. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्या आल्यास त्यामुळे महागाई वाढेल. स्वस्तामध्ये माल खरेदी करायचा आणि हव्या त्या किमतीला तो विकायचा हाच बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हेतू असतो हे लक्षात घ्यायला हवे.

युरोप आणि अमेरिकेच्या बाजारात जी आर्थिक धोरणे अपयशी ठरली, ती धोरणे भारतात राबविण्याचा या सरकारचा प्रयत्न चालू आहे. छोट्या व्यापार्‍यांना प्रोत्साहन देण्याची तसेच त्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे जाण्याची संधी द्यायला हवी. देशात किरकोळ व्यापार वीस टक्क्यांनी वाढत आहे आणि बेकारी दूर करण्यासाठी हा चांगला उपाय आहे, असे डॉ. जोशी म्हणाले.