कच्च्या पोलादाच्या निर्मितीत भारत आघाडीवर

नवी दिल्ली, दि. ३१ – कच्च्या पोलादाच्या निर्मितीत २०१५ साली भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात सेल आणि आरआयएनएल सारख्या प्रमुख पोलाद उत्पादक कंपन्या विस्ताराच्या योजना आखत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या बैठकीस संबोधित करताना ते बोलत होते.

२००८-०९ या आर्थिक वर्षात भारतात सुमारे ६६ दशलक्ष टन पोलाद उत्पादन होत होते. त्यात २०११-१२ या आर्थिक वर्षात मोठी वाढ होऊन, ही उत्पादन क्षमता ८९ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती वर्मा  यांनी दिली. देशांतर्गत लोह खनिजाचे साठे सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांवर वर्मा  यांनी आपल्या भाषणात अधिक भर दिला. त्यामुळे देशांतर्गत पोलाद उत्पादनात दीर्घकाळ सातत्य राखणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

या क्षेत्रात नवीन विचारांना वाव देण्यासाठी पोलाद नवपरिवर्तन समितीचे गठन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या (एनएमडीसी) कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. एनएमडीसी गेल्या काही वर्षात सतत नफ्यात आहे. त्याबद्दल एनएमडीसीच्या व्यवस्थापनाचे कौतुक करताना संसदीय समितीच्या सदस्यांनी कंपनीच्या कॉर्पोरेट उत्तरदायित्वाकडेही शर्मा यांचे लक्ष वेधले. समाजातील मागास घटकांना उत्कर्ष करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि तशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर एनएमडीसीच्या व्यवस्थापनाने भर द्यावा, अशी अपेक्षाही या बैठकीस उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.