दुष्काळी भागाची पाहणी करून युवराज राहुल गांधी अडीच तासात परतले

रायपूर, दि. २८ – कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी शनिवारी मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या सातार्‍याला भेट देऊन दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याच्या वृत्तामुळे, आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यासाठी आसुसलेल्या सातारकरांच्या पदरी शनिवारी केवळ पोकळ आश्‍वासनेच पडली. युवराज राहुल गांधी यांनी अवघ्या अडीच तासात दुष्काळी भागातील आम आदमीच्या वेदना जाणून घेत तेथून काढता पाय घेतला.

शनिवारी सकाळी राहुल गांधी यांचे समवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व अन्य काही नेत्यांनीदेखील माण तालुक्यातील झासी गावाला भेट दिली. येथील जलशी या पाण्याविना कोरड्या पडलेल्या तलावाचे निरीक्षण करून, त्यांनी बिजवडी आणि नंतर पांगारी गावांकडे कूच केले. या तिन्ही गावांतील नागरिकांनी राहुल यांना अक्षरशः घेराव घालत आम्हाला पाणी कधी मिळणार तेवढे सांगा, असा रोखठोक सवाल केला.

या नंतर राहुल यांनी पांगारी पशू चारा डेपोला देखील भेट दिली. तसेच मोजक्या ग्रामस्थांशी संवाद साधला. सुकलेल्या विहिरी, पाणवठे पाहून राहुल गांधी यांनी गावकर्‍यांना केवळ परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.