
काठमांडू – नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या दिसेनाशा झाल्यामुळे ही बंदी नेपाळ सरकारने घातल्याची चर्चा होत आहे. पण नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी या वाहिन्या बंद केल्या आहेत. नेपाळ सरकारने यासाठी काही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. सध्याच्या नेपाळमध्ये घडीला दूरदर्शन सोडून एकही भारतीय वृत्तवाहिनी दिसत नाही.
नेपाळमध्ये दिसेनाशा झाल्या भारतीय वृत्तवाहिन्या
यासंदर्भात नेपाळमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्या विरोधात भारतीय माध्यमे विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय माध्यमांनी अशा प्रकारे वृत्त देणे बंद करावे असे, नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी म्हटले आहे.
देशाच्या संसदेपासून अगदी नेपाळमधील रस्त्यांपर्यंत नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या काही निर्णयांमुळे त्यांना विरोध दर्शवला जातो आहे. पण आपल्या मर्यादा सोडून भारतीय वृत्त वाहिन्या वृत्तांकन करत असल्याचेही काही नेते म्हणाल्याचे समजते. दरम्यान यासंदर्भात कोणताही आदेश नेपाळ सरकारने दिलेला नाही, पण भारतीय वृत्तवाहिन्या दाखवणे आम्ही बंद करत असल्याचे नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
