14 जुन रोजी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर बॉलीवूडमध्ये सुरु असलेली घराणेशाही त्याला जबाबदार असल्याचा सुर सर्वच क्षेत्रातून आवळला जाऊ लागला. त्यातच प्रसिद्ध गायक सोनू निगम याने देखील बॉलीवूडमधील या मक्तेदारीविरोधात आवाज उठवला. संगीत क्षेत्रातील कलाकारही सुशांतप्रमाणे आत्महत्या करतील अशी भीती त्याने व्यक्त केली. संगीतकार अदनान सामीने देखील त्याच्या या विधानाचे समर्थन केले आहे.
एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात मक्तेदारी करणाऱ्या कंपन्यांविरोधात अदनान सामीने आवाज उठवला आहे. भारतीय फिल्म आणि संगीत क्षेत्रात आता मोठे बदल होणे गरजेचे आहे. या क्षेत्रांवर काही मुठभर लोक राज्य करण्याचा प्रयत्न करतात, त्याचबरोबर ते नव्या कलाकारांचे शोषण करतात. आपल्या देशात कोट्यावधी कलाकार आहेत. मात्र आपण प्रेक्षकांना रिमिक्स गाण्यांशिवाय काय देतो?,अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे. सध्या सोशल मीडियावरील ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.